राज्यात पीक परिस्थितीसह पाऊसही सर्वसाधारण असणार, अशी भविष्यवाणी यंदाच्या भेंडवळमधून करण्यात आली आहे.
यंदा कापूस , उडीद , ज्वारी , हरभरा ही पिकं चांगली येतील. तसंचत भाव ही चांगला मिळेल , तर वाटाणा , बाजरी , गहू, करडई ही पिके मध्यम स्वरूपात येतील, देशात पीक चांगले येईल. मात्र पिकांना भाव मिळणार नाही, असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
राजा कायम असणार म्हणजे देशात सत्ता पालट होणार नाही, देशाचं संरक्षण चांगलं राहील, परंतु देश आर्थिक अडचणीत असेल, असंही सांगण्यात आलंय.
पावसाळ्यात जून महिन्यात कमी पाऊस ,जुलै महिन्यात साधारण पाऊस तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस असणार आहे. तसंच अवकाळी पाऊस वर्षभर राहणार आहे, असं भाकित वर्तवण्यात आलं आहे.
तसंच गेल्या वर्षीप्रमाणे देशात आणि राज्यात आलेली रोगराई यावर्षी नसेल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
भेंडवळनं 2014 ते 2018 या 5 वर्षांत पावसाबद्दल सांगितलेली भविष्यवाणी आणि प्रत्यक्षात झालेला पाऊस यांच्यातला फरक या तक्त्यातून जाणून घेऊया.
शेतकऱ्यांसाठी हे वर्ष सर्वसाधारण राहिल, देशाची सत्ता स्थिर राहिल, नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता, चारा-पाण्याची टंचाई निर्माण होईल, असं भाकित वर्तवण्यात आलं आहे.
वाघ घराण्याचे वंशज पुंजाजी महाराज वाघ आणि सारंगधर महाराज वाघ यांनी भेंडवळची भविष्यवाणी जाहीर करतात. भेंडवळच्या भविष्यवाणीबद्दल सारंगधर महाराज सांगतात, "आम्ही सांगत असलेलं भाकीत 70 ते 75 टक्के खरं ठरतं. गेल्या 20 ते 25 वर्षांपासूनचा तसा रेकॉर्ड आमच्याकडे उपलब्ध आहे."
पण भेंडवळच्या भाकिताला वैज्ञानिक आधार नाही अशी टीका होते. यावर महाराज
सांगतात की, "आमच्या भविष्यवाणीला वैज्ञानिक आधार नसेलही पण नैसर्गिक आधार
आहे. कारण निसर्गातल्या घडामोडींवरूनच आम्ही भाकीत सांगतो. हवामान खातं जसं
हवामानाचा अंदाज व्यक्त करतं तसंच आम्हीही अंदाजच व्यक्त करतो. याबाबत
कुणीच एकदम अचूक असू शकत नाही."
या भविष्यवाणीला तार्किक आधार नाही'
भेंडवळच्या भविष्यवाणीबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीची (अंनिस) वेगळी भूमिका आहे. समितीतर्फे एक पत्रक काढण्यात आलं. त्यात भेंडवळच्या घटमांडणीला शास्त्रीय आधार नाही, असं म्हटलं आहे.
याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्याशी संपर्क साधला.
"भेंडवळच्या भविष्यवाणीला कुठलाही तार्किक आधार नाही. हा केवळ कल्पनाविलास आहे. तुम्ही कोणत्याही एखाद्या वस्तूला कशाचंही प्रतीक कसं काय मानू शकता? शेतामध्ये उघड्यावर काही पदार्थ घट घालून मांडणे व दुसऱ्या दिवशी त्या पदार्थांमध्ये नैसर्गिकरित्या झालेल्या बदलाचा आधार घेऊन देशाचं भविष्य वर्तवणं ही पद्धत अयोग्य आहे," असं अविनाश पाटील सांगतात."संदिग्धता ठेवणं ही भविष्यवाल्यांची खरी खासियत असते. ते कधीच अमक्या एका जिल्ह्यात इतका इतका पाऊस पडेल असं सांगत नाहीत. त्यांच्या भविष्यवाणीत कधीच नेमकेपणा नसतो. भविष्यवाणी करताना ही मंडळी अतिशय मोघमपणे संपूर्ण देशातल्या पावसाबद्दल सांगतात. म्हणजे आपण म्हटलं, महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे पाऊस नाही पडला, तर तुमच्याकडे नसेल पडला पण देशात इतर ठिकाणी तर पडला ना, असं म्हणायला हे मोकळे असतात," पाटील पुढे सांगतात.
याबद्दल पत्रकार आणि पर्यावरणाचे अभ्यासक अतुल देऊळगावकर यांचं मत जाणून घेतलं.
"सृष्टीमधल्या निरीक्षणांवरून भेंडवळमध्ये भाकीत वर्तवलं जातं. पण त्यासाठी नेमके कोणते घटक लक्षात घेतले हे कधीच सांगितलं जात नाही. त्यामुळे त्याला विज्ञान कसं म्हणणार?" असा सवाल देऊळगावकर उपस्थित करतात.
"शिवाय ज्याचा पायाच चुकीचा आहे, ज्याला कोणत्याही प्रकारचा वैज्ञानिक अर्थ नाही त्यावर विश्वास ठेवायचा कसा? काही लोकांना यातून मानसिकरित्या बरं वाटत असेल एवढाच या भविष्यवाणीचा मी अर्थ काढतो," असं देऊळगावकर म्हणतात.
70 ते 75 टक्के भविष्यवाणी खरी ठरते या सारंगधर महाराज यांच्या दाव्यावर देऊळगावर सांगतात की, "त्यांची भविष्यवाणी किती टक्के खरी ठरते, यावर मी काही विश्वास ठेवणार नाही. कारण भविष्यवाणी बरोबर ठरल्यास ही मंडळी त्याबद्दल सांगत सुटतात पण चुकल्यानंतर मात्र कुणीही समोर येत नाही."
हे पण वाचा...
● अशी करतात पावसाबद्दलची भविष्यवाणी