रात्रभर या घटाला तसंच ठेवलं जातं. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी घटातल्या बदलांचं निरीक्षण करून भाकीत वर्तवलं जातं. जसं यंदा या 18 धान्यांपैकी मुगाचे दाणे हे आहे त्या परिस्थितीत न राहता बाहेर फेकले गेले. त्यामुळे मग यंदा मुगाचं उत्पादन चांगलं होईल, असं भाकीत वर्तवण्यात आलं. जर धान्यं आतल्या बाजूस फेकलं गेलं, तर उत्पादन कमी होईल, असं मानतात.
पाऊस किती पडणार, हे कोणत्या ढेकळावर घागरीतलं किती पाणी पडलं यावरून ठरवलं जातं. जसं की, यंदा पहिल्या क्रमांकाचं ढेकूळ थोडंफार भिजल्यानं जून महिन्यात साधारण पाऊस होईल असं सांगण्यात आलं.
पानाच्या विड्यावरल्या सुपारीकडे राजाचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं. सुपारी आहे त्या जागी कायम राहिल्यास राजा गादीवर कायम राहील, असं भविष्य वर्तवण्यात येतं. जसं यंदा विडा आहे त्या परिस्थितीत आढळला असला तरी थोडाफार सुकलेला होता. त्यामुळे यंदा राजा गादीवर कायम राहील, पण त्याला संकटांना सामोरं जावं लागेल, असं भाकीत वर्तवण्यात आलं.
शिवाय घागरीवर ठेवलेल्या करंजीवरून आर्थिक परिस्थितीबद्दलचा अंदाज लावतात. करंजी गायब झाल्यास आर्थिक परिस्थिती खालावेल, असं सांगितलं जातं. यंदा मात्र करंजी आहे त्या जागेवर कायम आढळल्यानं अर्थव्यवस्था सुरळीत चालेल, असं सांगण्यात आलं आहे.
घटमांडणीची परंपरा
जवळपास 315 वर्षांपूर्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी बुलडाण्यातल्या भेंडवळ इथे घटमांडणीची परंपरा सुरू केली. या परंपरेनुसार, वाघ यांचे वंशज अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी गावाबाहेरच्या शेतात घटाची मांडणी करतात.
यासाठी शेतात 1 फूट खोल खड्डा खणण्यात येतो. खड्डा खोदताना त्यातून बाहेर पडलेल्या मातीतून 4 ढेकळं बाहेर काढतात. या 4 ढेकळांकडे पावसाच्या 4 महिन्यांचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं. म्हणजे पहिल्या क्रमांकाचं ढेकूळ जून, दुसरं जुलै, तिसरं ऑगस्ट तर चौथं ढेकूळ म्हणजे सप्टेंबर.नंतर या 4 ढेकळांवर पाण्यानं भरलेली मातीची घागर ठेवली जाते. या घागरीवर करंजी, पापड, कुरडई, वडा असे पदार्थ ठेवले जातात.
घटापासून दीड फुटांच्या अंतरावर 18 प्रकारची धान्यं ठेवली जातात. यामध्ये
अंबाडी, कपाशी, गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, तीळ, बाजरी, मटकी, जवस, वटाणा
यांचा समावेश असतो. शिवाय घटाशेजारी पानाचा विडा ठेवला जातो. त्यावर
सुपारी ठेवण्यात येते.
'हवामान खातं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे'
विदर्भातले अनेक शेतकरी या भविष्यवाणीवर लक्ष ठेवून असतात. याविषयी देऊळगावकर सांगतात की, "इथे शेतकऱ्याची मानसिकता लक्षात घ्यायला हवी. आपल्याला कुणीतरी आशा दाखवावी असं शेतकऱ्यांना वाटत असतं. त्यामुळे मग कधी पंचांग तर कधी कुणी जाणता त्यांना काही ना काही सांगत राहतो. भेंडवळची भविष्यवाणीही याच प्रकारात मोडते. यातून त्यांना एक प्रकारचा मानिसक आधार मिळतो. याशिवाय दुसरं काहीही होत नाही."
"खरं तर हवामान विभागानं शेतकऱ्यांना फोनवर मॅसेज करून पाऊस पडणार की नाही, हे सांगायला हवं. जोवर हे होत नाही तोवर शेतकरी या भाकीतावर विश्वासच ठेवतील. यासारख्या गोष्टींतून बाहेर पडण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. शेतकऱ्यांना शिक्षित केलं पाहिजे," अशी अपेक्षा देऊळगावकर यांनी व्यक्त केली.भेंडवळच्या भविष्यवाणीला माध्यमांमध्ये चांगली प्रसिद्धी मिळते. पण पुढे ही भविष्यवाणी किती खरी ठरते, यावर माध्यमं भाष्य करताना दिसत नाहीत. यावर देऊळगावकर म्हणतात की, "प्रसिद्धी माध्यमांनी भेंडवळसारख्या गोष्टींकडे लक्षच देऊ नये. यासारख्या अंदाजांना वर्तमानपत्रांत स्थानच असता कामा नये. जर द्यायचं असेल तर गेल्या 50 वर्षांत यांचं भाकीत किती खरं ठरलं, किती खोटं ठरंल, का ठरलं, त्यामागची कारणं काय हे स्पष्टपणे सांगायला हवं. म्हणजे मग त्यामागचं विज्ञान समजून घ्यायला मदत होईल."