‘महाराष्ट्र दिना’चा थरारक इतिहास जाणून घ्या..!
Type Here to Get Search Results !

‘महाराष्ट्र दिना’चा थरारक इतिहास जाणून घ्या..!

 


इंग्रजांच्या गुलामगिरीतून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताची सुटका झाली.. मात्र, त्यावेळी आपल्या देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता.. संस्थान, राजे-महाराजे नावापुरते काही होईना अस्तित्वात होते.. 1956 मध्ये राज्य पुनर्रचना कायदा अस्तित्वात आला नि हळूहळू भाषा नि प्रदेशांच्या आधारे राज्यांची निर्मिती होऊ लागली..

महाराष्ट्राचा इतिहास
अन्य राज्ये तयार होत असतानाही, मराठी माणसाला महाराष्ट्रासाठी फार वाट पाहावी लागली.. सुरुवातीला मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा घाट घातला जात होता.. मुंबई प्रांतात गुजराती व मराठी भाषिक लोक राहत. त्यामुळे मुंबई हे वेगळं राज्य निर्माण करण्याची मागणी जोर धरीत होती. गुजराती लोकांना स्वतःचं वेगळे राज्य हवं होतं, तर मराठी बोलणारे लोक स्वत:साठी वेगळं राज्य मागत होते.. मुंबईसह महाराष्ट्र करण्यासाठी देशात अनेक आंदोलने झाली..

मुंबईतील फ्लोरा फाउंटन परिसरात 21 नोव्हेंबर 1956 दिवशी तणावाचे वातावरण होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचं नाकारलं. मराठी माणसे चिडली. सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात कामगारांचा एक विशाल मोर्चा आला..

तत्कालिन सरकारनं पोलिसी बळाचा वापर करुन हा मोर्चा उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज सुरु केला. मात्र, तरीही आंदोलक हटत नव्हते. अखेर पोलिसांनी जमावावर गोळीबार केला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 107 आंदोलक हुतात्मे झाले.

या घटनेनंतर जनतेत असंतोष उफाळून आला..संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. हुतात्म्यांचे बलिदान नि मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला नमते घ्यावे लागले नि मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला.. संसदेत २५ एप्रिल रोजी ‘बॉम्बे पुनर्रचना कायदा-1960’ लागू करण्यात आला.

अखेर महाराष्ट्र अस्तित्वात आलं..
1 मे 1960 रोजी हा कायदा अंमलात आला. गुजरात नि महाराष्ट्राची राज्यांचा जन्म झाला. तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हाती ‘महाराष्ट्राचा मंगल कलश’ दिला. नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली.

मराठी माणसासाठी हा दिवस खास आहे.. या दिवशी महाराष्ट्राचा इतिहास सांगणारे विविध कार्यक्रम, पारंपरिक मिरवणुका काढल्या जातात.. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळं हा दिवस साजरा केला गेला नाही.. मात्र, यंदा कोरोनाचे निर्बंध नसल्यानं महाराष्ट्र दिन जोरात साजरा होणार, हे नक्की..!

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section