17 जूनपर्यंत पेरण्या टाळा, कृषी विभागाचं आवाहन, 5 दिवस धुवाँधार पावसाचे
महाराष्ट्रात पुढील पाच दिवस धुवाँधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पुढील पाच दिवस धुवाँधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागपूर हवामान विभागाने वाशिम जिल्हा आणि परिसरात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे 17 जूनपर्यंत पेरण्या टाळा असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे.
वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची खरीप हंगाम 2021 मधील शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. शेतकरी पेरणीच्या तयारीत आहे. शेतकरी बांधवांनी शेतीसाठी लागणाऱ्या सर्व निविष्ठांची खरेदी अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच करावी. सर्वसाधारण खरीपाची पेरणी ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करण्याबाबतची शिफारस कृषि विद्यापीठाने केली आहे. जिल्ह्यात ९ जून २०२१ पर्यंत ६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण ४६ महसूल मंडळापैकी नागठाणा, रिसोड, गोवर्धन, रिठद, कवठा, शिरपूर, मंगरूळपीर, शेलू, पोटी, मानोरा, शेंदुर्जना व गिरोली या महसूल मंडळात ७५ मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे
जिल्ह्यात काही ठिकाणी शेतकरी पेरणी करीत आहे. प्रादेशिक हवामान पूर्वानुमान केंद्र, नागपूर यांनी हवामानाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार विदर्भात १० ते १३ जून दरम्यान वादळी वारे आणि विजेच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. वारेसुद्धा ताशी ३० ते ४० किमी प्रति तास वेगाने वाहणार आहे. राज्यस्तरावर सुद्धा कृषि विभागाच्या वतीने दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी १७ जूनपर्यंत पेरण्या करण्यात येऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. शेतकरी बांधवांनी पुढील तीन-चार दिवसात पेरणी केल्यास अतिवृष्टीमुळे पेरणी दडपण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे टाळावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
पुढील चार दिवस पावसाचे; खबरदारी घ्या
नागपूर प्रादेशिक हवामान अंदाज केंद्राने जिल्ह्यात 11 जून ते 14 जून या कालावधीत वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच 12 आणि 13 जून रोजी अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच शेतकरी बांधवांनी सतर्क राहावे, असे आवाहन वाशिमचे निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले आहे.
विजांचा कडकडाट सुरू असताना नागरिकांनी घराबाहेर जाणे टाळावे, जनावरे झाडाखाली, पाण्याच्या स्त्रोताजवळ, विद्युत खांबाजवळ बांधू नयेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून स्वतः सुरक्षित ठिकाणाचा आसरा घ्यावा. झाडाखाली थांबू नये. जलसाठा जवळ, नदी जवळ जाऊ नये. लहान मुलांना जलसाठ्यावर, नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये. पुलावरून तसेच नाल्यावरून पाणी वाहत असताना कोणीही स्वतः किंवा वाहनासह पुल, नाला ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. पाऊस सुरू असताना विजेच्या तारा, जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते तरी त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन हिंगे यांनी केले आहे.
महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाचे
दरम्यान, महाराष्ट्रतील कोकण किनारपट्टीवरही अत्यंत मुसळाधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि कोकणात पुढचे 5 दिवस अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज होसाळीकर यांनी व्यक्त केला.