फक्त स्मार्टफोन वापरून मागच्या पाच ते सहा वर्षात भारतातील ८० कोटी जनता गरीबीतून बाहेर पडली असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी म्हटले आहे.
काही वर्षांपासून भारतात डिजिटल क्रांतीचे वारे वाहू लागले आणि ग्रामीण भागातही डिजिटल व्यवहार पोहोचले. सरकारी अनुदान, विविध शासकीय सुविधांचे लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मिळणे शक्य झाले. जन धन योजनेमुळे कोट्यवधी लोकांची बँक खाती उघडली गेली. भारतात झालेल्या या डिजिटल क्रांतीचे गोडवे आता थेट संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत गायले गेले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी सांगितले की, मागच्या पाच ते सहा वर्षांत स्मार्टफोनच्या सहाय्याने भारतातील ८० कोटी लोकांना गरीबीतून बाहेर पडणे शक्य झाले आहे. ‘वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांसाठी भूकेचा प्रश्न सोडविण्याच्या दिशेने प्रगतीचा वेग’ या विषयावर बोलत असताना फ्रान्सिस यांनी डिजिटायलायझेशनमुळे भारताच्या ग्रामीण भागाचा कसा विकास झाला, याचे उदाहरण दिले.
भारतात आता इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे, हे सांगताना त्यांनी स्मार्टफोनमुळे बँकिंग व्यवहार कसे सोपे झाले, याचेही उदाहरण दिले. भारताच्या तुलनेत इतर जागतिक दक्षिण देशांनी (ग्लोबल साऊथ) या दिशेने भारताऐवढे प्रयत्न केलेले नाहीत. भारताने मात्र डिजिटलायझेशनमध्ये आघाडी घेतली.
“भारताच्या ग्रामीण भागातील जनता यापूर्वी बँकिंग व्यवस्थेशी जोडली गेली नव्हती. मात्र आज ते स्मार्टफोनच्या माध्यमातून आपले व्यवहार करत आहेत. स्मार्टफोनच्या माध्यमातूनच बिलाचे पैसे दिले जातात आणि पेमेंट स्वीकारले जाते. यामुळेच भारतात इंटरनेटचा वापर वाढला असून आर्थिक व्यवहारांसाठी त्याचा सकारात्मक वापर होत आहे”, असेही फ्रान्सिस यावेळी म्हणाले.